डॉ. योगेश क्षीरसागर यांचा पत्रकार परिषदेत आरोप, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा दिला इशारा
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जागेच्या रजिस्ट्री वरून घडलेली घटना याच्याशी आमचा संबंध नाही आम्ही मालक नसताना किंवा उपस्थित नसताना राजकीय हेतूने आमच्यावर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. गुन्हे दाखल करणारे सध्या कुठे आहेत असा सवाल करत. कर नाही तर डर कशाला यापुढे खोटे गुन्हे दाखल केल्यास सहन करणार नाही असे माजी नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी ठणकावून सांगितले आहे.

गुरुवारी क्षीरसागर यांच्या संपर्क कार्यालयाच्या सभागृहात डॉ. योगेश क्षीरसागर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, डॉ. सारिका क्षीरसागर, विनोद मुळूक, विलास विधाते, रवींद्र कदम, गणेश वाघमारे, विकास जोगदंड, प्रभाकर पोकळे, महेश धांडे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, गेल्या 25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रजिस्ट्री कार्यालयात जी घटना घडली त्या घटनेशी माझे वडील माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि माझे नाव जाणीपूर्वक टाकण्यात आले आहे. खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे.
वास्तविक पाहता ही जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मालकीची आहे. ती पवार कुटुंबीयांनी घेतलेली असून मा. न्यायालयाच्या निकालानंतरच या जागेचा व्यवहार केला गेला आहे. हा व्यवहार दोन कुटुंबातील असताना ज्यांचा या व्यवहाराशी संबंध नाही ते लोक त्याठिकाणी आले कशासाठी होते. ज्या जागेचा व्यवहार होणार होता ती जागा अधिकृतपणे अण्णांच्या नावावर आहे असे असताना या ठिकाणी येऊन गोंधळ घालने मारहाण करणे आणि दबावतंत्राचा वापर करणे हे कितपत योग्य आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आवारातील हा गोंधळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेला आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीची हार्डीक्स गायब तर झाली नाही ना? पोलिसांची तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. ज्या दिवशी हा व्यवहार होता त्यादिवशी मी स्वतः मुंबईत होतो तर भारतभूषण क्षीरसागर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच आराम करत होती असे असताना आमची दोघांची नावे जाणीवपूर्वक घेण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात नगरपालिका निवडणुका होणार आहेत आम्हाला जाणीवपूर्वक अडकवण्याचे कारस्थान यानिमित्ताने करण्यात आले आहे.
खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करण्याचा प्रयत्न
खोट्या तक्रारी आणि खोटी माहिती पसरवून बदनाम करण्याचा प्रयत्न करणे ही दुसरी वेळ आहे खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी आमच्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही शांत बसलो आहोत दाखल करण्यात आलेले गुन्हे केवळ राजकीय हेतूनेच असल्याचे आता सिद्ध झाले आहे. आमच्यावर गुन्हा दाखल करणारा फिर्यादीच आरोपी असून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत स्वर्गीय काकूंचे वारसदार म्हणून अशी घटना घडणे अपेक्षित नव्हते आम्हीपण वारसदार आहोत दोन वारसदारांनी मधील फरक जनतेने ओळखायला हवा ज्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते सध्या कुठे आहेत? असा सवाल करत कर नाही तर डर कशाला असे म्हणून डॉ योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांचा भांडाफोड केला.

